
टिळकनगर (वार्ताहर)
राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगचा कर्मचारी काल लाच लुचपतच्या जाळेत तीन हजारांची लाच घेतांना अलगद अडकला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवनाथ अशोक थोरात, वय -३८ असे त्याचे नाव असून तो शेती महामंडळात राखणदार पदावर कार्यरत होता.
याबाबद अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शेती व्यवसाय करत असुन, त्यांची श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे गट न 302/4 मधील 12 एकर वडिलोपार्जित जमीन त्यांचे पंजोबा यांनी शेती महामंडळ टिळकनगर यांच्या कडे खंडा साठी सन१९७० मध्ये दिली होती, त्या नंतर १९९७-९८ मध्ये मा महसूल आयुक्त नाशिक याच्या आदेशान्वये उक्कलगाव शिवारातील शेत गट न १६८ मध्ये ०४एकर क्षेत्र तक्रारदार यांचे पणजोबा यांचे नावे तक्रारदार यांच्या कुटुंबियांना कसण्यासाठी मिळाली आहे, सदर शेत जमीनच्या सात बारा उतारा वर वारसा प्रमाणे २००६ पर्यंत ची वारसा नोंद बरोबर लावण्यात आली होती.
सन २००६ मध्ये तक्रारदार यांच्या आई चे वारस म्हणून नाव ७/१२ उतारा वर नोंद लावण्यात आलेली होती, परंतु २००७ पासून ७/१२ उतारा वर आईचे नाव नसल्याचे तक्रारदार यांना २०१३ मध्ये लक्षात आले. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आईचे नावे उप विभागीय अधिकारी,श्रीरामपूर यांचेकडे अपील अर्ज केला होता. त्यावर २०२० पर्यंत कोणताही आदेश पारित झाला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा आईच्या नावे उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे वारस हक्काप्रमाणे ७/१२ वर नाव नमूद करण्यासाठी डिसेंम्बर २०२२ मध्ये अर्ज केला आहे, त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
सदर जमीन तक्रारदार स्वतः कसत होता. दिनांक २९/०१/२०२३ रोजी आरोपी थोरात यांनी तक्रारदार यांना फोन करून सांगितले की, सदर जमीन महाराष्ट्र शेती महामंडळाच्या नावे आहे ती तू कसु नको, जर ती जमीन तुला कसायची असेल तर तू मला ५०००रुपये दे, मी तुला सदर जमीन कसु देईल असे म्हणून लाच मागणी केली बाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिली असता सदर तक्रारीचे अनुषंगाने काल 2 फेब्रुवारीला बेलापूर येथे पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ५,००० लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ३००० लाच मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.
त्यावरून बेलापूर नाक्याच्या फरसाण दुकाना जवळ लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष ३,००० लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्राचे शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, ला.प्र. वि.पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, नाशिकचे अपर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रमेश चौधरी, अंमलदार,वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,रविंद्र निमसे चालक हारून शेख सह आदींनी केली.