श्रीगोंदा (प्रतिनिधी) - तालुक्यातील काही भाग वगळता खरीप हंगामात पेरणी एवढा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, उडीद, मूग, सोयाबीन असे कमी अधिक पावसावर येणारे धान्य पेरणी केली आहे. जेवढा पाऊस पडला त्यावर ही पिकांची उगवण होत असते असा शेतकऱ्यांचा पूर्वापार अनुभव असल्याने मागील आठ पंधरा दिवसात जसा वापसा होईल तश्या पेरणी केली मात्र काही ठिकाणी बाजरी, तूर उगवली नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे .
तालुक्यातील सहा कृषी मंडळाच्या पैकीं तीन ते चार कृषी मंडळात येणाऱ्या गावातून पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे तक्रार तालुका कृषी विभागाकडे आल्या आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या शेताची पाहणी करण्यात येणार असून पेरणी केली मात्र बियाणे उगवले नाही अश्या शेतकऱ्यांनी आपली तक्रार तालुका कृषी कार्यालयात नोंदवावी त्याचे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.