श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप केलेल्या उसासाठी 184.85 रुपये प्रति टन याप्रमाणे दुसरा हप्त्याची एकूण 31.50 कोटी रुपयांची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
कारखान्याने गाळप हंगाम 2021 - 2022 मध्ये एकूण 8 लाख 94 हजार 630 मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यास 10.64 टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्यानुसार एफआरपीप्रमाणे उसाचा दर 2 हजार 434 .85 इतका होत आहे. कारखान्याने यापुर्वी शेतकर्यांना उसाचा पहिला हप्ता 2 हजार 250 रुपये प्रति टन याप्रमाणे दिला आहे. आता 184.85 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकर्यांना देण्यात आला आहे. एफआरपीप्रमाणे राहिलेली रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
4 हजार 900 हेक्टर उसाची नोंद
पुढील गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची नोंद सुरू असून आतापर्यंत 4 हजार 900 हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे शेतकर्यांनी केली आहे. यामुळे शेतकर्यांनी वेळीच उसाची नोंद कारखान्याच्या गट कार्यालयात करावी, असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.