श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
कुकडी डावा कालवा रब्बी हंगाम आवर्तन सोडण्यास अगोदरच कालवा सल्लागार समितीने एक महिना उशीर केला त्यात
ज्वारी पाण्यावाचून जळाल्या असताना आता 1 फेब्रुवारीपासून आवर्तन सुटणार असले तरी पाण्याच्या नियोजनात 40 दिवसांच्या आवर्तनात तालुक्यातील लाभ क्षेत्राला अवघे 9 दिवस पाणी मिळणार असल्याने नेहमीप्रमाणे चार्यांना कुठे पाणी सोडले कुठे पाणीच मिळाले नाही, अशी बोंबाबोंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाटबंधारे विभागाने आवर्तन कालावधीचे नियोजन जाहीर केले आहे. हे पाणी अगोदर टेल टू हेड याप्रमाणे शेवट करमाळा तालुक्याला जाणार आहे. पाणी टेलला जाण्यासाठी 7 दिवस कालावधी जाणार असून करमाळा तालुक्यात वहन क्षमता कमी असली तरी तिथे 9 दिवस आवर्तन मिळणार आहे. नंतर क्षेत्र कमी असले तरी कर्जतमध्ये तब्बल 12 दिवस पाणी मिळणार आहे.
तालुक्याच्या क्षेत्रात वहन क्षमता आणि विसर्ग करमाळा, कर्जत पेक्षा जास्त असला तरी श्रीगोंदा तालुक्यातील चार्याची अवस्था आणि तालुक्यातील आवर्तन सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे आवर्तनात येणार्या अडचणी यामुळे श्रीगोंद्यात शेतकरी अगोदरच विचारात पडले आहेत.
नेहमीप्रमाणे चार्यांना पाणी येणार का आणि पाणी आले तर शेवटच्या शेतकर्यांच्या शेतात पाणी जाणार का? याबाबत शाश्वती राहिली नाही. उशिरा सुटलेले रब्बीचे आवर्तन उन्हाळ्याच्या तोंडावर सोडले असून पूर्ण क्षमतेने मिळणार का? हा प्रश्न आहे.
उर्वरित कालावधीत पारनेर, जुन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रात पाणी मिळणार असले तरी आवर्तन सुरू झाल्यावर पाणी टेलपर्यंत येताना तालुक्यात बहुतांशी भरणे होत असते. तालुकानिहाय पाणी वापराचा कोटा पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष आवर्तन कालावधीमध्ये बदल संभवण्याची शक्यता अधीक्षक अभियंता यांनी सांगितली, त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.