
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
कोणी काही अपप्रचार करू द्या. माझी बांधिलकी सामान्य जनतेशीच आहे. त्याच जोरावर आगामी विधानसभा निवडणूक भारत राष्ट्र समिती पक्षाकडून आपण सर्व ताकदीनिशी लढविणार आहोत. राज्यातही भारत राष्ट्र समितीचे सरकार येण्यासाठी राज्यभर कार्यरत राहू. सामान्य जनतेच्या भक्कम पाठबळावर व विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक जिंकूच, असा विश्वास भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेले नेते घन:शाम शेलार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
शेलार म्हणाले, राज्यातील सध्याचे राजकारण दूषित झाले आहे. येथे सध्या कार्यरत असलेल्या कोणत्याच पक्षाला व प्रमुख नेत्यांना जनतेशी, जनतेच्या समस्यांशी काही घेणे देणे नाही. हे सर्वजण केवळ सत्तामग्न नेते असून स्वविकासालाच ते प्राधान्य देत आहेत. याउलट भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केवळ 9 वर्षाच्या सत्ताकाळात राज्याचा विकासात्मक कायापालट करुन खर्या अर्थाने बळीचे राज्य साकारले आहे. त्यांची सामान्य जनता व विकासाशी बांधिलकी असून सामान्य माणसांचा बारीक सारीक विचार करणारे जनहितैशी सरकार ते चालवित आहेत. शेतकर्यांना अखंडीत वीज पुरवठा, पाणी, रस्ते, उद्योग अशा सर्वच बाबतीत तेलंगणा सरकारने आदर्शवत व अनुकरणीय कामगिरी केवळ नऊ वर्षात केलेली आहे.
यावेळी प्रा. संजय आनंदकर, अझीम जकाते, महेंद्र गायकवाड, श्रीपाद ख्रिस्ती, रामभाऊ रायकर, आप्पासाहेब शेटे, राजेंद्र काकडे, प्रा. विजय पाटील, डॅा. अनिल कोकाटे, विक्रम शेळके यांची भाषणे झाली. शाम जरे यांनी प्रास्ताविक केले तर गोरख घोडके यांनी आभार मानले.
1 शेतकर्यांचा तेलंगणा दौरा
पुढील महिन्यात मतदारसंघातील जवळपास एक हजार शेतकरी, कार्यकर्ते यांचा तेलंगणाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असून तेथील बीआरएसने केलेला शाश्वत विकास सर्वांना दाखवण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.