राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक भागातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काल बुधवारी व्यास पौर्णिमा/गुरुपौर्णिमा बेटात महंत रामगिरीजी महाराज यांनी साध्या पद्धतीने साजरी करत पूर परिस्थितीची पाहणी केली.
काल गुरुपौर्णिमा व्यासपूजन निमित्त श्रीक्षेत्र सराला बेट येथे विविध कार्यक्रम संपन्न होणार होते. मात्र नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या भागातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने बेटाकडे येण्यास भाविकांना मज्जाव केल्याने घरीच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन करत महंत रामगिरी महाराज यांनी आपल्या लाखो भाविकांना आपल्या घरीच गुरुचे स्मरण करून पूजा विधी करण्यास सांगितले होते.
त्यामुळे महंत रामगिरीजी महाराज यांनी बेटातील योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या समाधी स्थळावर जलाभिषेक करून व्यासपूजन, गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी केली. नंतर परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी यावेळी महंत रामगिरीजी महाराज यांनी केली.
याप्रसंगी उपस्थित असलेले माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी भाविकांच्या सुविधेसाठी श्रीक्षेत्र सराला बेटावर मोठ्या उंचीचा पूल बांधावा जेणेकरून भाविकांना सुलभता येईल यासाठी भाविकांच्या वतीने त्यांनी सरकारकडे मागणी केली. याप्रसंगी आमदार रमेश बोरणारे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, बंडू वाणी, उद्योजक महेंद्र गोडगे, बाळकृष्ण कापसे, सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, बाबासाहेब दिघे, दत्तू खपके, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदी उपस्थित होते.