आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या भिज पावसात गारठल्याने 17 मेंढ्या व 2 शेळ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली. त्यामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवसापासून आश्वी सह परिसरात भिज पावसामुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. सतधार पडणार्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थंडी वाढली आहे. त्याची झळ नागरिकांसह शेतकर्यांच्या जनावरे तसेच पशु पक्षांना बसत आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील बाळू चिंधू तांबे हे मेंढ्या चारण्यासाठी म्हणून शिबलापूर परिसरात वास्तव्यास आहेत. बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे तांबे यांच्या 5 मेंढ्या दगावल्याने अंदाजे 50 हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.
शिबलापूर येथील अमीन सलीम शेख यांच्या एका शेळीला गारव्याचा तडखा बसल्याने 8 हजार रुपये किंमतीची शेळी दगावली आहे. तसेच दाढ खुर्द येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या चद्रकांत हरिभाऊ कोळपे यांच्या 3 मेंढ्या व 1 शेळीचे करडू मृत्यूमुखी पडल्याने त्याचे 45 हजाराचे नुकसान झाले. तर पिंप्री येथे बाळासाहेब लहानू दातीर यांच्या 6 मेंढ्या व खळी येथे वाघू हिरु पोकळे यांच्या 3 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्यामुळे मेंढपाळाचे लाखो रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती कळताच गुरुवारी सकाळी शिबलापूरचे उपसंरपच दिलीप तबाजी मुन्तोडे, दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी, कामगार तलाठी आव्हाड, तलाठी मंगल सांगळे, ग्रामसेवक चांडे, सुरेश ब्रोंद्रे, राजेंद्र पाचरणे, कारभारी जोरी, भागवत जोरी, संदीप जोरी, लहानु साळवे, रमेश जोशी आदिंनी त्या-त्या घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा करत शेतकर्याला धिर दिला असून मेंढपाळाचे मोठे अर्थिक नुकसान झाल्यामुळे शासनाने आर्थिक साहाय्य देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
संवेदनाहिन पशुवैद्यकीय अधिकारी
आश्वी खुर्द येथील पशुवैद्यकीय आधिकार्याला मेंढपाळासह स्थानिक नागरिकांनी वारंवार संपर्क करुनही उपलब्ध झाले नाही. सकाळी 9 वाजेपासून मेंढपाळ दवाखान्यासमोर वाट पाहत बसून होते, मात्र तरीही डॉक्टर आले नाही. त्यामुळे आश्वी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भडकवाड यांनी फोनकरुन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाला संवेदनाहिन डॉक्टरांची माहिती दिली. कार्यालयाकडून समज मिळताच त्या डॉक्टरने घटनास्थळी जातो असे सांगितले मात्र 5 वाजेपर्यंत ते आले नसल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे त्या डॉक्टरचे नावही परिसरातील नागरिकांना माहित नसल्याची माहिती मिळाली आहे.