अहमदनगर | Ahmednagar
काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत आहे. या शक्ती विरुद्ध लढा देण्याचा काळ आता आला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारी करण्याचे आवाहन केले.
शरद पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात भाजप सरकारविरोधात जोरदार संघर्ष करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला. नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंहामंडळाच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, धर्माच्या नावाने अंतर वाढवलं जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती. काही शक्ती जाती-जातीत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहे. त्या शक्तीशी लढाई करणं, संघर्ष करण्याचं आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे. हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे.
शरद पवार पुढे म्हणाले, देशातील चित्र बदलत आहे. काल मी बंगळुरूमध्ये होतो. तिथं नवं सरकार आलं आहे. तिथं अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं. त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. सर्व देशाला वाटत होतं की, कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजपा जिंकणार. मात्र काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं. यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते. त्यापैकी ७० टक्के तरुण होते आणि सर्व जातीजमातीमधील होते.