राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
शेतकरी बांधवांसाठी उद्बोधक असे तंत्रज्ञान, ठिबक सिंचन योजना, विविध प्रकारची कृषी अवजारे, खते, सुक्ष्म खते, बी-बियाणे, गृहोपयोगी वस्तू तसेच शासनाच्या कृषी, सहकार, पणन विभागाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व वाबळेज इव्हेंटमार्फत आज गुरूवार दि. 14 ते सोमवार दि. 18 असे पाच दिवस भव्य शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील बचत गटांच्यावतीने विविध वस्तुंचे विक्री प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या महोत्सवात शेतकरी, व्यापारी व सेवकवर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
आज गुरूवार दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याहस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थान प्रेरणा समूहाचे संस्थापक व साई संस्थानचे विश्वस्त्त सुरेशराव वाबळे हे भूषविणार आहेत. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जि.प. सदस्य धनराज गाडे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जि.प. सदस्या नंदाताई गाढे, राष्ट्रवादीचे राहुरी शहराध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, नगराध्यक्ष अनिल कासार, पंचायत समितीच्या सभापती बेबीताई सोडनर, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे आदी मान्यवरांसह या महोत्सवास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
दि. 15 ते दि. 17 रोजी या तीन दिवसांत डॉ.अनिल दुरगुडे, डॉ.मधुकर भालेकर, डॉ.नंदकुमार भुते, डॉ.सचिन नलावडे आदी शास्त्रज्ञ पीक परिसंवादात शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.