
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
अहमदनगर जिल्ह्यात सहकार चळवळ उभारणीत महत्वाचा वाटा असणार्या शिलेदारांपैकी एक असलेल्या माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे जीवनकार्य दिशादर्शक ठरले आहे. सरपंच ते मंत्री या त्यांच्या राजकीय जीवन प्रवासात त्यांनी सहकार, समाजकारण, कृषी, शिक्षण या क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिले.
शिस्तप्रिय व अभ्यासू स्वभाव हे वैशिष्ट असलेल्या ज्येष्ठनेते स्व.शंकरराव कोल्हे यांनी जिल्हा बँक व जिल्ह्याच्या विकासासाठी कायम साथ दिली. तसेच मंत्रीमंडळात परिवहन, महसूल, उत्पादन शुल्क या खात्यांमध्ये त्यांचे काम दिशादर्शक ठरले. त्यांच्या निधनाने अ.नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राज्याच्या राजकारणातील व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.