
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
संपूर्ण राज्यात दि.1 एप्रिल 2010 पासून बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कायदा अंमलात आला आहे. या अनुषंगाने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद विशद करण्यात आली आहे. परंतु राहुरी तालुक्यातील काही शाळा व महाविद्यालयात दरम्यान पालकांकडून अवास्तव फी आकारण्यात येत असल्याबाबतचे वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, पिंटूनाना साळवे व बाळासाहेब जाधव, गणेश पवार, सचिन साळवे, तुषार दळवी आदींनी यासंदर्भात गट शिक्षणाधिकारी कार्यालयास निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत गटशिक्षण अधिकार्यांनी तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आदेश जारी केला आहे.
त्यात म्हटले, सर्वमाध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना याबाबत कळविण्यात येते, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम 2009 कलम 13 नुसार कोणत्याही शाळा-महाविद्यालय शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अधिसूचित केलेल्या फीपेक्षा प्रवेशासाठी कोणत्याही अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येऊ नये. शाळा प्रवेशाबाबतची कोणतीही तक्रार होणार नाही, याची दखल घेण्यात यावी. तसेच आरटीई कलमभंग झाल्यास संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे पत्र राहुरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना गटशिक्षण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे. यामुळे अवाजवी फी आकारणी करणार्या शाळा विद्यालयांना चाप बसणार आहे.
राहुरी तालुक्यातील सर्व शाळांनी या नियमांचे पालन न केल्यास व याबाबत तक्रार आल्यास संबंधित मुख्यध्यापकांवर कार्यवाही करण्यासाठी गटशिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.
- निलेश जगधने, जिल्हा प्रवक्ते