
लोणी (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील अखिलेश विलास लव्हाटे या १३ वर्षाच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली.
गोगलगावमधील सादतपुर शिवरालगत विलास प्रभाकर लव्हाटे यांचे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब रहाते. त्यांचा एकुलता मुलगा अखिलेश चिंचपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. नेहमीप्रमाणे तो शनिवारी दुपारी तो शाळेतून घरी आला. त्याची आई व बहिणी शेतीकामासाठी घराजवळच्या शेतात गेल्या.पण अखिलेश सायकल घेऊन फिरायला गेला.
रात्र झाली तरी तो घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचा शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही.सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मगर व परिसरातील तरुण मदतीला आले. चिंचपूर, लोणी याभागात त्याचा शोध घेतला. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र काहीच माहिती मिळाली नाही. रात्रीचे बारा वाजले. सर्वजण घरी गेले. मात्र रामप्रसाद मगर यांनी विलास लव्हाटे यांना तो कुठे कुठे जायचा याची माहिती विचारली असता त्यांनी सादतपुर शिवारातील जवळच्या शेततळ्यावर तो कधी कधी माती आणण्यासाठी जायच्या असे सांगितल्यावर ते शेततळ्यावर गेले.
तेथे त्याची सायकल दिसून आली.जवळच त्याचे कपडे व हातातील घड्याळही दिसून आले.त्यावरून तो शेततळ्यात असावा याची खात्री पटली. बॅटरीच्या उजेडात शेततळ्यात शोधले असता त्याचा मृतदेह दिसून आला. रात्री दीड वाजता त्याला बाहेर काढण्यात आले. लोणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन केले. शोकाकुल वातावरणात अखिलेशला अखेरचा निरोप देण्यात आला. शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेततळ्याला तारेचे कुंपण करणे गरजेचे झाले आहे.