
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिष्यवृत्तीसाठी नगर जिल्ह्यातून 47 हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेसाठी पाचवीचे 225 तर आठवीचे 143 केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाल्या असल्याने शिष्यवृत्तीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे सध्या तरी शिक्षण विभागाने या परीक्षा आयोजनाचे आदेश दिले असले तरी अंतिम निर्णय काय होतोय याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाच्यावतीने 23 मे रोजी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातून 2 हजार 19 शाळांच्या 47 हजार 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यात 30 हजार 115 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 961 आठवीचे विद्यार्थी आहेत. पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाल्या असल्याने शिष्यवृत्तीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे.
त्यामुळे सध्या तरी शिक्षण विभागाने या परीक्षा आयोजनाचे आदेश दिले असले तरी अंतिम निर्णय काय होतोय याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्यावतीने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी केंद्र निश्चितीचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, करोनामुळे एप्रिलमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलून 23 मे रोजी घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे.
यंदा सराव परीक्षा बंद
करोना संसर्गामुळे यंदा शिष्यवृृत्तीचे परीक्षेसाठी जिल्हा पातळीवरून एकही ऑफलाईन सराव परीक्षा घेता आली नाही. मात्र, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांसह अन्य तालुक्यांंत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सराव परीक्षा झालेल्या आहेत.