<p><strong>संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangmner</strong></p><p>गेल्या महिन्यापासून बंद असलेले शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने पुन्हा सुरू करण्यासाठी कत्तलखानाचालकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.</p>.<p>संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड, जमजम कॉलनी, भारतनगर आदी ठिकाणी अनेक बेकायदेशीर कत्तलखाने सुरू होते. राज्यात गोहत्त्या बंदी कायदा असताना संगमनेरात मात्र दररोज अनेक जनावरांची कत्तल सुरू होती. शहरातून दररोज सुमारे 10 हजार किलो मांस मुंबई, ठाणे शहरांमध्ये जात होते. </p><p>त्यामुळे संगमनेर शहर हे गोमांस तयार होण्याचे प्रमुख केंद्र बनले होते. मुंबईसह परराज्यात संगमनेरातील मांस निर्यात होते. कत्तलखाना व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेकजण या व्यवसायात उतरले आहेत. पोलिसांनी शेकडो वेळा कारवाया करूनही हे कत्तलखाने पुन्हा नव्या जोमाने सुरू होत होते. यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबतच शंका उपस्थित केली जात होती.</p><p>पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पदभार स्विकारताच शहरातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्व कत्तलखाने त्यांनी बंद केले. कत्तलखानेच बंद झाल्याने या कत्तलखाना चालकांची चलबिचल झाली आहे. त्यांनी कत्तलखाने सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. </p><p>शहर पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांची ये-जा सुरू झाली आहे. पोलीस अधिकारी याबाबत निर्णय घेत नसल्याने काही कत्तलखाना चालकांनी थेट राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजकीय पदाधिकार्यांच्या गाठी-भेटी घेऊन कत्तलखाने पुन्हा सुरू करावते यासाठी या पदाधिकार्यांना साकडे टाकले जात आहे.</p><p>पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या सहकारी कर्मचार्यांना कत्तलखान्यांकडे लक्ष देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. स्वत: पोलीस निरीक्षक हे रात्री अपरात्री शहरात फिरत असून कत्तलखाना परिसरात ते भेट देत आहेत. काही ठिकाणी जनावरांचे मुंडके आढळल्याने या जनावरांची कत्तल कोठे होते याबाबत ते माहिती घेत आहेत.</p><p>कत्तलखान्यामुळे जोर्वे रोड परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले होते. कत्तलखान्यातील घाण पाणी नदीपात्रात जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. सर्वच कत्तलखाने बंद झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.</p>