
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 68 वासरे व एका गाईला पोलिसांनी जीवदान दिले. शहरालगतच्या समनापूर परिसरात पोलिसांनी काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करून या जनावरांना कसायांपासून वाचवले आहे.
संगमनेर शहर व परिसरात बेकायदेशीररित्या गोवंश जातीच्या जनावरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. अनेकदा कारवाई करूनही कत्तलखाना चालकांनी आपला व्यवसाय जोमात सुरू ठेवला आहे.
शहरा लगतच्या समनापूर परिसरात हॉटेल सासुरवाडी जवळ काही गोवंश जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने ठेवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पवार यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली.
याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अनेक जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदरची जनावरे ही राजीक रज्जाक शेख (रा. संगमनेर) याची असल्याचे पोलिसांना समजले. या ठिकाणी 1 लाख 36 हजार रुपये किमतीचे 68 जिवंत गोवंश जनावरे, 20 हजार रुपये किमतीची एक गाय ठेवण्यात आली होती. पोलिसांनी सर्व जनावरे पांजरपोळ येथे पाठवून दिली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव, पोलीस नाईक भांगरे , पवार, जाधव, उगले, पोलीस शिपाई मुकरे, पवार, दाभाडे यांनी केली.
याबाबत पोलीस नाईक निलेश धादवड त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजीक शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण 1976 चे सुधारीत सन 1995 मे कलम 5 (अ) 1,9 तसेच प्राण्याना निर्दयतेने वागण 21 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.