सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
नगर-मनमाड हायवे लगत कोकमठाण तीन चारी परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून उड्डाण पुलाच्या बाजूला समृद्धी महामार्गाच्या कामासाठी माती उचलल्यामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहे. हे खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहे.
यामुळे अपघात होण्याची शक्यता असून या ठिकाणी सुरक्षा गार्डची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, कैलास वाघ, सुनील कवडे, साजिद मणियार, वसंत त्रिभुवन आदींनी केली आहे. जवळपास 25 ते 50 फुटापर्यंत या खड्ड्यांची खोली असून नगर-मनमाड महामार्गाच्या अगदी जवळ आहे.
तसेच परिसरातील शेतकरी व शेतमजूर आपली जनावरे चारण्यासाठी याच खड्ड्यांच्या बाजूने जात असतात. त्यामुळे या खड्ड्यात जनावरे पडण्याची देखील भीती निर्माण झाली. तेव्हा कंपनीने ताबडतोब सुरक्षा गार्डची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे यांनी केली.