सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पंचवीस वर्षांपूर्वी नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता.
गावात अवैध धंद्यांना खतपाणी घालू द्यायचे नाही म्हणून ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेत पंचवीस वर्षांपूर्वी केलेला ठराव पुन्हा संमत केला. अवैध धंद्याविरोधात कोणाला कितीही राजकारण करू द्या मात्र आम्ही अवैध धंद्यांना पाठबळ देणार नाही अशी भूमिका सरपंच अमोल औताडे यांनी ग्रामसभेत घेतली.
अवैद्य धंद्याविरोधात पोहेगाव येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली.यावेळी नितीनराव औताडे, कोल्हे कारखान्याचे संचालक अशोक औताडे, सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, प्रकाश रोहमारे, सचिन शिंदे, दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, चंद्रकांत औताडे, तात्यासाहेब झांबरे, राजेंद्र औताडे, निखील औताडे, निवृत्ती औताडे, अशोकराव नवले, सचिन शिंदे, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, विनायक मुजगुले, कैलास औताडे, रवींद्र भालेराव, नितीन नवले, बाळासाहेब रोहमारे, अजित औताडे, निकिता चौधरी, पुष्पा काकडे, सुनंदा औताडे, रुपाली वाघ, वर्षा निकम, सुनंदा साळुंके, मनीषा ब्राम्हणे, वैशाली सोनवणे, अनिता गांगुर्डे आदींसह महिला ग्रामस्थ व व्यापारी वर्ग उपस्थित होते.
प्रास्ताविक ग्रामसेवक रामदास काळे यांनी केले. नितीनराव औताडे यांनी सांगितले, पंचवीस वर्षांपूर्वी घेतलेल्या दारुबंदीच्या निर्णयावर पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्याची सूचना ग्रामस्थांनी मांडली. गावात अवैध धंद्यांना खतपाणी घालू दिले नाही म्हणूनच नगर जिल्ह्यामध्ये पोहेगावचा झालेला विकास पहावयास मिळतो. पंचवीस वर्षापूर्वी दारूबंदी केल्याने पोहेगावमध्ये झालेल्या विकास आज दिसतोय.
या विकासाला अवैध धंद्या वाल्यांची काळी नजर आम्ही लागू देणार नाही. अवैध दारू विक्री विरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी पोहेगाव ग्रामस्थ सज्ज आहेत. अवैध दारू विक्री लवकरात लवकर बंद होण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. व्यापारी व छोट्या उद्योजकांचे नुकसान होऊ नये म्हणून सकाळी 11 वाजता ग्रामसभा संपल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले.