
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या साईसच्चरित पारायण सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो भाविक सहभागी होत असतात. या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होणार्या भाविकांना आवश्यक असणार्या अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार व साईसच्चरीत पारायण सोहळ्याची व्याप्ती वाढवून हा पारायण सोहळा यापुढील काळात भव्यदिव्य करणार, असे प्रतिपादन साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साईसच्चरीत पारायण सोहळ्यास आशुतोष काळे यांनी भेट देऊन नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पारायण सोहळा साईभक्तांसाठी एक मोठा उत्सव असून दरवर्षी हजारो पारायणार्थी सहभागी होत असतात. यावर्षी देखील या पारायण सोहळ्यासाठी 3 हजार 500 महिला व 2 हजार पुरुष अशा मोठ्या प्रमाणात 5500 पारायणार्थींनी सहभाग घेतला आहे. ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यादृष्टीने पारायणार्थींना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढील काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होणार्या पारायणार्थिंना सोयी सुविधा देण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही ना. काळे यांनी दिली.
याप्रसंगी विश्वस्त महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, सुहास आहेर, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, श्री. जोरी, श्री. उगले, डॉ. किसवे आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.