साई संस्थानच्या 598 कर्मचार्‍यांसंदर्भात कार्यवाही सुरू - ना. विखे

साई संस्थानच्या 598 कर्मचार्‍यांसंदर्भात कार्यवाही सुरू - ना. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानमधील 598 कंत्राटी कर्मचार्‍यांच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व निर्णयांबाबत शासनाच्या विधी व न्याय विभाग आणि संस्थान स्तरावर तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

संस्थान मधील 598 कंत्राटी कर्मचारी संस्थानचा 2004 चा नवा कायदा अस्तित्वात येण्यापुर्वीपासून कार्यरत आहेत. मात्र अद्याप या कर्मचार्‍यांना सेवेत कायम न केल्यामुळे या संदर्भात अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करीत आहेत.

याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवून कर्मचार्‍यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी सुध्दा 1052 कर्मचार्‍यांना अशाच पध्दतीने पाठपुरावा करून सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला होता. उर्वरित 598 कर्मचार्‍यांच्या बाबतीत सुध्दा आता सकारात्मक विचार होण्याच्यादृष्टीने ना. विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मंत्रालयात विधी न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. कलौटी, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत विधी व न्याय विभाग तसेच संस्थान स्तरावर कालबध्द कार्यवाही करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

या सर्व कर्मचार्‍यांना कायम सेवेत घेण्याबाबत सेवाप्रवेश नियमांसह सुधारित आकृतिबंध निश्चित करणे, कर्मचार्‍यांची सेवाज्येष्ठता निश्चित करणे तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम सेवेप्रमाणे लाभ मिळावेत याबाबत विधी व न्याय विभाग आणि संस्थानच्या पुढाकाराने कार्यवाही करून लवकरच कर्मचार्‍यांना दिलासा मिळवून देऊ, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com