शिर्डी | शहर प्रतिनिधी
संपूर्ण विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे भारतातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान (Sai Baba Sansthan) स्थापनेला येत्या दि.१३ फेब्रुवारीला शंभर वर्षे पूर्ण होत असून साईबाबा संस्थान स्थापना शताब्दी वर्ष सोहळा (Sai Baba Sansthan centenary year) साजरा होणार का? असा प्रश्न साईभक्तांना पडला आहे.
तसेच २०१८ साली साईसमाधी शताब्दी वर्षात देखील सरकारकडून संस्थानला एक छदामही न मिळाल्याने शताब्दी वर्षात करोडो भाविकांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवून पदरी निराशा दर्शवली होती. त्यामुळे एकंदरीतच दोन्ही शताब्दी वर्ष साईभक्तांसाठी अनमोल ठेवा असतांना संस्थान प्रशासनाने मात्र ते अपेक्षेप्रमाणे साजरा करायला हवे होते असे मत शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान हे श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा पुरविणारी देशातील नंबर दोनची श्रीमंत संस्था आहे. या संस्थानकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात.
श्री साईबाबा संस्थानची स्थापना दि. १३ फेब्रुवारी १९२२ रोजी अहमदनगर सिटी सिविल कोर्ट कडून करण्यात आली आहे.त्यावेळी महिपती दासगणू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पाच अजीव सदस्यांसह पंधरा जणांची कमिटी स्थापन करण्यात आली होती. श्री साईबाबा संस्थानची पहिली सभा दासगणू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
संस्थानच्या स्थापनेनंतर पहिल्या रामनवमीला म्हणजेच ०६ एप्रिल १९२२ रोजी झाली. साईभक्तांकडून मिळणारी देणगी हे संस्थांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यावेळी स्थापनेनंतर भक्त मंडळात २३२ सदस्यांचा समावेश होता. आणी संस्थानकडे २ हजार २३८ रुपये होते. त्या तुलनेत मात्र शंभर वर्षात आताची सभासदांची संख्या १ लाख ७७ हजार इतकी आहे. आणी उत्पन्नातून सुमारे २ हजार ५०० कोटींहून अधिक ठेवी असून ४५० किलो पेक्षा जास्त सोने, साडेपाच हजार किलो चांदी तर १० कोटींचे मौल्यवान हिरे एवढी संपत्ती आहे. तसेच कायमस्वरूपी आणी कंत्राटी मिळून जवळपास सात हजार कामगार आहे.
हा शंभर वर्षात झालेला एवढा मोठा फरक, असे असतांना देशात नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. श्री साईबाबांची खरी महती ही सिनेअभिनेता मनोजकुमार यांनी १९७७ साली निर्माण केलेल्या "शिर्डी के साईबाबा" या चित्रपटामुळे साता समुद्रापलीकडे जाऊन पोहचली.आणी हाच चित्रपट साईबाबांच्या भाविकांसाठी मैलाचा दगड ठरला असून आज शिर्डीत भाविकांची मांदियाळी पहायला मिळत आहे.
शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर आज सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जात आहे. साईसंस्थान विश्वस्थ मंडळामध्ये आजरोजी अनेक फेरबदल झाले. राज्यशासनाच्या अखत्यारीत साईसंस्थानचा कारभार गेल्याने या विश्वस्त मंडळात मागील पंधरा वर्षांपासून राजकीय सदस्यांची वर्णी लागतांंना दिसत आहे. मात्र राजकारणाच्या ह्या व्यस्त कारभारात संस्थान स्थापना शताब्दी वर्षाचा आजतरी प्रत्यकाला विसर पडला असल्याने करोडो साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आजरोजी साईबाबा संस्थानने भाविकांच्या देणगीतून जमा झालेल्या रकमेतून राज्य सरकारला अनेक विकास कामांसाठी कोटयवधींचा निधी दिला आहे. परंतु ज्या संस्थानने देशात नंबर दोनचे श्रीमंत संस्थान म्हणून ख्याती प्राप्त केली आहे त्याच साईसंस्थान प्रशासनला आणी राज्य सरकारला संस्थान स्थापना शताब्दी वर्षाचा विसर का पडावा? हा संशोधनाचा विषय आहे.
श्री साईबाबा संस्थानची स्थापना झाल्यावर पहिले अध्यक्ष म्हणून महिपती श्री दासगणू महाराज यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी १९४५ पर्यत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली तर आता साईसंस्थानला शंभर वर्षे पूर्ण होत असून साई संस्थानच्या अध्यक्षपदाची सुत्रे युवा आमदार आशुतोष काळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.संस्थानच्या इतिहासात अध्यक्षपदाचा हा दुर्मिळ योग या दोनही अध्यक्षांनी लाभला आहे.