सद्गुरू रोहिदासजी प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाविरूध्द खंडपीठाच्या आदेशानंतर दोषारोपपत्र दाखल

सद्गुरू रोहिदासजी प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाविरूध्द खंडपीठाच्या आदेशानंतर दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची नोकरीच्या आमिषाने सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सर्व आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सुरूवातीला पोलिसांनी संस्थापक अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे (रा. आलमगीर रोड, भिंगार) हा दोषी आढळल्याने त्याच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. यानंतर फिर्यादी यांच्याकडून खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकेवर सुनावणी होऊन दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानंतर उर्वरित आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल झाले आहेत.

खजिनदार अनिता सुभाष साळवे, सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, भिंगार), सचिव अनिल तुळशीराम शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव ता. पाथर्डी), अनुराग सुभाष साळवे (रा. आलमगीर, भिंगार) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू रोहिदासजी अनु. जाती केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खांडगाव (ता. पाथर्डी) तसेच वडारवाडी, भिंगार येथील आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांना संचालक मंडळाने नोकरीचे आमिष दाखवून तसेच 2013 ते 2019 पर्यंत विनावेतन कामकाज करून घेऊन त्यांचे नावे आलेले मानधन कर्मचार्‍यांना न दिल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर 20 गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सुभाष साळवे विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने इतर आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल न केल्याने फिर्यादी हरेश्वर साळवे, रमेश चक्रनारायण, दीपक गायके, प्रसाद सोनवणे, अमोल वांढेकर, धनंजय शिंदे, नंदू कोतकर, धनंजय वांढेकर, स्वप्निल ढगे, श्रीकांत कचरे, प्रदीप शिंदे, राजश्री कडवे, वृषाली होळकर, रेणुका आघाव, नेहा गंगेकर, श्रीकांत जाधव, सचिन भिसे, मच्छिंद्र वांढेकर, दीपक भवार, विजय गाडेकर यांनी दोषारोप पत्राची फेर तपासणी होऊन पुरवणी दोषारोप पत्र दाखल होणेकामी औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र फौजदारी रिट याचिका दाखल केल्या होत्या. 8 मार्च 2022 रोजी न्यायमूर्ती वि. के. जाधव व एस. सी. मोरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली.

सरकारी वकील व याचिकाकर्त्यांचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद होऊन दोषारोपत्रामधील त्रुटी याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. अरविंद अंबेटकर व अ‍ॅड. नरेंद्र पाटेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने खंडपीठाने तपासी अधिकारी यांना उर्वरित संचालक मंडळाच्या तपासाबाबत विचारणा केली असता तपासी अधिकारी यांनी तपास चालू असल्याचे सांगितले. यावर पुढील तपास पूर्ण करून तपासामध्ये संचालक मंडळ दोषी आढळल्यास दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. तपासासाठी तपासणी अधिकारी यांनी वेळ मागितला होता. 29 मार्च 2022 रोजी सुनावणीदरम्यान तपासी अधिकारी यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात उर्वरित संचालक मंडळ दोषी आढळल्याने आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले असल्याचे सांगितले. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील अ‍ॅड. एम. एम. नारळीकर यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com