
टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई 2009) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. अहमदनगर जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत नोंदणीकृत 400 शाळांमधील प्रवेशासाठी 6957 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 3058 जागा उपलब्ध आहे.
आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्याची प्रवेशाची संधी वाया जाऊ नये, यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार्या शाळांची संख्या 400 आहे. तेथील 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेशाच्या एकूण जागा 3,058 आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका (रेशनकार्ड), पालकांचा वाहन चालविण्याचा परवाना, वीज अथवा दूरध्वनी बिल, मिळकत कर देयक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशांतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया संपली असून पुढील टप्प्यात शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी एकत्रितपणे राज्यस्तरीय लॉटरीची प्रक्रिया होणार आहे.