केंद्राचा सहकारावर ताब्याचा प्रयत्न

महसूलमंत्री थोरातांचा जिल्हा बँक संचालकांना सावधानतेचा इशारा
केंद्राचा सहकारावर ताब्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये जिल्हा बँकेचे योगदान मोठे आहे. साखर कारखाने, दुध संघ हे बँकेमुळे उभे राहू शकले. मागील वर्ष साखर कारखानदारीसाठी अडचणीचे होते. यंदा साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या कर्ज फेडीसाठी कारखानदारांनी पुढाकार घ्यावा. तसेच बँक प्रशासन व संचालक मंडळाने बँकेच्या वसुलीकडे लक्ष द्यावे.

येणारा काळ हा बँकिंग क्षेत्रासाठी महत्वाचा असल्याने कर्ज वाटप करतांना आणि वसुली करतांना काळजी घ्यावी लागेल. केंद्र सरकार सहकारावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकर्‍यांची बँक शेतकर्‍यांच्या ताब्यात राहावी, यासाठी सावध राहा, अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

जिल्हा बँकेची 64 वी सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. सभेला मंत्री थोरात यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी चेअरमन उदय शेळके, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, करण ससाणे, अंबादास पिसाळ, राहुल जगताप, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, माजी चेअरमन बाजीराव खेमनर, रामदास वाघ, अनुराधा नागवडे, सचिन गुजर, काकासाहेब ताकपिर यांच्यासह सीईओ रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री थोरात यांनी करोनामुळे सावध होण्याची आठवण संचालकांना करून दिली. करोनाची काळजी घ्या. तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. नगर जिल्हा व केरळ राज्यात रुग्ण वाढ दिसून येत आहे. यामुळे दुसर्‍या वर्षी बँकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यावी लागत असल्याचे महसूल मंत्री थोरात म्हणाले.

जिल्हा बँकेसाठी शेतकरी हा मुलभूत घटक आहे. सहकार क्षेत्रात आणि बँकिंगमध्ये बदल घडत आहे. केंद्र सरकार सहकारावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी साधव राहून अभ्यास करून शेतकर्‍यांची बँक शेतकर्‍यांच्या ताब्यात राहिली पाहीजे. सहकारीतील बदलांचा ज्येष्ठ नेते शरद पवार अभ्यास करत असून त्यांच्या मार्गदर्शना खाली वाटचाल करून असे, मंत्री थोरात यावेळी म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष कानवडे, संचालक सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्पे यांचे मनोगत झाली. तर शिर्डी विकास सोसायटीचे प्रमोद गोंंदकर, मोहटा विकास सोसायटीचे भिमराव पालवे, खेडले विकास सोसायटीचे रामदास कोरडे, सचिन गुजर या सुचना करत प्रश्न मांडले. या प्रश्नांना चेअरमन शेळके यांनी उत्तरे दिले.

सभासदांना 9.50 टक्के लाभांश

बँकेच्या निधी, ठेवी, खेळते भांडवल व नफ्यात यंदा वाढ झाल्याची माहिती अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली. कर्जवाटपात वाढ झाल्याने तसेच ठेवीवरील व्याजदरात घट झाल्याने गुंतवणूकीत घट झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये नफा 3 कोटी 22 लाखांनी वाढून 42 कोटी 54 लाखांवर पोहचला. तर खेळत्या भांडवल 1 हजार 413 कोटी 18 लाखांच्या वाढीसह 10 हजार 770 कोटी 63 लाख आहे. ठेवी 8 हजार 364 कोटी 83 लाखांवर आहेत. यासह नाबार्ड अल्प व्याजात घेण्यात येणार्‍या कर्जाची रक्कम 1 हजार 400 पर्यंत पोहचले आहे. तसेच कर्ज वाटप वाढल्याने गुंतवणूक मात्र एक हजार कोटींनी कमी झाली आहे. बँकेचा नेट एनपीए हा शुन्य टक्के असून एकूण एनपीए हा 5.54 टक्के असल्याची माहिती शेळके यांनी दिली. तसेच यंदा सभासदांना 9.50 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा चेअरमन शेळके यांनी केली.

संचालकांनी अभ्यास करावा

पुढील काळाचा वेध घेवून बँकिग क्षेत्रात काम करावे लागणार आहे. यासाठी बँकेच्या संचालकांनी अभ्यास करावा. वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच ते सहा लोकांचे विचार मंचाची स्थापना करावी. पाहिजेसाठी त्यासाठी त्यांना काही प्रमाणात मानधन ही द्यावे, बँक शेतकर्‍यांची असून यामुळे घडणार्‍या बदलांचा अभ्यास अगत्याचा ठरतो, असे ना.थोरात म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com