अहमदनगर (प्रतिनिधी) -
शहराच्या कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सारडा गल्ली परिसरामध्ये अतिक्रमण करून शेकडो लोकांनी रस्त्यावरच
वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. या अतिक्रणांमुळे बाजारपेठेतून चालणेही अशक्य झाले आहे. महिलांची छेडछाड, मंगळसूत्रांची चोरी, वाहतुकीची कोंडी असे अनेक प्रकार सातत्याने होत आहेत. महापालिकेने ही अतिक्रमणे कायमची काढण्याची ठोस कारवाई पुढील पाच दिवसांत करावी, अन्यथा हिंदूराष्ट्र सेना तीव्र आंदोलन करत बाजारपेठेतच उपोषणास करेल, असा इशारा हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने मनापा प्रशासनास देण्यात आला.
हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने बाजारपेठेतील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेचे शहर प्रमुख घन:श्याम बोडखे यांनी मनापा उपयुक्त सुनील पवार यांना निवेदन दिले. यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले. बाजार पेठेत अतिक्रमण करणारे व्यावसायीक हे सर्व व्यवसाय महापालिकेला एकही रुपयाचा कर न देता राजरोसपणे करत आहेत. महापालिकेकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या प्रमुखांनी अतिक्रमण हटविण्याच्या वल्गना वेळोवेळी केल्या आहेत. मात्र आजतागायत कोठेही आवश्यक कारवाई करण्यात आलेली नाही. निवेदनावर सागर ठोंबरे, परेश खराडे, सागर ढूमणे, महेश निकम, रुद्रेश अंबाडे, विनोद निस्ताने, सचिन पळशीकर, केशव मोकाटे, सागर डोंगरे, सनी परदेशी, स्वनिल लहरे, सुरज गोंधळी, विनोद अनेचा आदींच्या सह्या आहेत.