अहमदनगर (प्रतिनिधी) -
रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठेच्या अटकेसाठी जरे कुटुंबियांनी आजपासून एसपी ऑफिससमोर उपोषण
सुरू केले आहे. पोलिसांवर असलेला दबाव आणि राजकीय नेत्याच्या पाठबळामुळेच बोठेला अटक होत नसल्याचा आरोप रुणाला जरे यांनी केला आहे.
रेखा जरे यांच्या हत्याकांडाला तीन महिने उलटून गेले तरी अजूनही बोठेला अटक झालेली नाही. त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी रेखा जरे यांच्या आई सिंधू वायकर (फिर्यादी) आणि मुलगा रुणाल यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे. गोरख आढाव आणि प्रकाश पोटे यांनी जरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना रुणाल जरे यांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त करतानाच काही आक्षेपही घेतले आहे. एसपी मनोज पाटील आणि तपासी अधिकारी डीवायएसपी अजित पाटील यांनी तपास चांगल्या पध्दतीने केला. घटनेनंतर अवघ्या 18 तासातच पाच जणांना अटक केली, मात्र तीन महिने उलटूनही मुख्य आरोपी बोठेला अटक होत नाही. पोलीस राजकीय दबावाखाली असल्याने त्याला पकडत नाही. काही राजकीय नेत्यांचे त्याला पाठबळ असल्याा आरोपही रुणाला जरे यांनी यावेळी केला.
...........
पोलिसांकडून सहकार्याची विनंती, पण...
पोलिसांकडून रुणाल जरे यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. डीवायएसपी प्रांजल सोनवणे यांनी रुणाल जरे यांची भेट घेत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शहराचे डीवायएसपी विशाल ढुमे यांनीही रुणाल जरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. बोठेच्या अटकेसाठीच उपोषणाला बसलो असून पोलिसांना सहकार्य केले जाईल. बोठेला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे रुणाल जरे यांनी सांगितले.
कायद्याचा फास आवळला
30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. 3 डिसेंबरला बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तेव्हापासून तो पसार आहे. जिल्हा न्यायालय आणि हायकोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्याने स्टॅन्डींग वॉरंटला कोर्टात आव्हान दिले, पण तेही कोर्टाने नामंजूर केले. 26 फेबु्रवारीला कोर्टात पाच आरोपीविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केले आणि चार मार्चला बोठेला कोर्टाने फरार घोषित केले. बोठेला 9 एप्रिलपर्यंत स्वत:हून हजर होण्याचे फर्मान काढण्यात आले असून पोलिसांनी जाहीरनामाही प्रसिध्द केला आहे. मात्र तरीही या क्षणापर्यंत बोठे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता कायदेशीर फास आवळल्यानंतर तो सापडेल याच आशेवर पोलिस प्रशासन बसले आहे.
आ. जगताप वगळता इतरांची चुप्पी
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दांत निषेध करत पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले, मात्र त्यानंतर कोणत्याच राजकीय नेत्यांनी या प्रश्नावर आवाज उठविला नाही. रुणाल जरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देत अटकेसंदर्भात पोलिसांना आदेशित करण्याची मागणी केली. पण अजूनही बोठेला अटक झालेली नाही. त्यामुळेच जरे कुटुंबिय उपोषणाला बसले आहेत.
तृप्ती देसाईंचाही पाठींबा
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही जरे कुटुंबियांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. बोठेला तातडीने अटक करावी, त्याच्या मालमत्तेच्या जप्तीची आदेश द्यावेत. तसेच त्याला सहकार्य करणार्यांनाही अटक करावी. जरे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी उपोषणाला पाठिंबा देत असल्याची भूमिका देसाई यांनी व्हिडीओद्वारे मांडली आहे.