सुपा (वार्ताहर) - पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे रथ यात्रा काढून करोनाच्या तिसर्या लाटेपासून बचावासाठी गावात रथ यात्रा काढत जनजागृती करण्यात आली. गावातील करोना समितीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
करोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेने सर्वच स्तरातील नागरिकांची मोठी हानी केली. पहिल्या लाटेचा तडाखा जसा शहरी भागाला बसला तसाच दुसर्या लाटेने ग्रामीण भागाचे हाल केले. दुसरी लाट थोडी कमी होत असताना तिसरी लाट येणार, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात लहान मुलांना जास्त धोका असल्याचे शासन व शास्त्रज्ञ सांगत आहेत. म्हणून शासनाच्यावतीने सावधनतेच्यादृष्टीने उपाय आखले जात आहेत. याचाच भाग म्हणून अस्तगाव ग्रामपंचायत करोना समितीच्यावतीने गावात रथ यात्रा काढून करोना जनजागृती करण्यात आली.
याबाबत ग्रामसेविका सारिका वांळुज यांनी आधिक माहिती देताना सांगितले, प्रशासनाच्यावतीने रथयात्रा जनजागृती अभियान स्पर्धा आयोजित केली होती. अस्तगाव ग्रामपंचायतीने यात सहभाग घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामपंचायतीच्यावतीने बैलगाडी व ट्रॅक्टर सजवून, त्यामध्ये भारत मातेची वेशभूषा केलेल्या स्त्री बसवून पंचसुत्रीचे बॅनर हातात घेऊन, लाऊड स्पिकरवर सूचना व मार्गदर्शन करत ग्रामफेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना पंचसुत्री पाळण्याचा आग्रह करण्यात आला. यात मास्क वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे, साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, तसेच बाहेरुन आलेल्यांचे विलगीकरण करणे व लस उपलब्ध झाल्यावर न चुकता लस घेणे या सूचना नागरिकांना देण्यात देण्यात आल्या.
अस्तगावात करोनाच्या दुसर्या लाटेत गावातील पाच टक्के नागरिक बाधित झाले तर मृत्यू दर अर्धा टक्का होता. त्यामुळे करोनाची तिसरी लाट गावात येऊच द्यायची नाही, असा निश्चिय गावातील करोना समिती व ग्रामस्थांनी केला आहे. करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी जास्त हानिकारक आहे, म्हणून पंचसुत्रीचा वापर करत ग्रामस्थ आतापासून सावध झाले आहेत. या जनजागृती फेरीत, रामदास काळे, संतोष काळे, कल्याण काळे, राजेंद्र काळे, युनूस तांबोळी, खोमणे महाराज, वैभव काळे, सुवर्णा काळे, तुषार खोसे, आशा धाडगे, शारदा ठाणगे, स्मिता ठोंबरे, शिवाजी नानेकर, काते तलाठी, सुरेश काळे, अरुण काळे, जालिंदर काळे, प्रमोद काळे, केशव काळे, संध्या काळे, ईश्वर पठारे, बाबा देठे, अशोक साळे, सरपंच लता काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.