<p><strong>कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav</strong></p><p>राज्यात शेतीला पुरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. </p>.<p>त्यातच करोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने बंद केलेली दूध खरेदी पुन्हा सुरु करुन दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.</p><p>श्री.परजणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यात साधारणत: दीड कोटी लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे दररोज संकलन केले जात होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनामुळे दुधाची मागणी घटली. दूध उत्पादन खर्च आणि महागाईमुळे मोठी तफावत निर्माण झाल्याने शेतकर्यांना हा व्यवसाय परवडेनासा झाला. सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात करोना संसर्गाची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. </p><p>लॉकडाऊन सुरु झाल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. दुधाची मागणी देखील 25 ते 30 टक्क्यांनी घटली आहे. गेल्यावर्षी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर तोटा सहन केला. दोन तीन महिन्यात परिस्थिती थोडीफार सुधारलेली असतानाच पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने दुग्ध व्यवसायावर आता पुन्हा मोठा परिणाम जाणवू लागला आहे.</p><p>शेतीपूरक व्यवसायापैकी एक महत्वपूर्ण व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात असल्याने या व्यवसायाला बळ देण्याचे काम शासनाकडून होणे गरजेचे आहे. शासनाने दूध खरेदी करुन सद्या अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा द्यावा अशीही मागणी श्री. परजणे यांनी केली आहे.</p>