<p><strong>राहुरी |प्रतिनिधी| Rahuri</strong></p><p>राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील अतिदुर्गम डोंगराळबहूल भागातील चिखलठाण येथील बुळे पठार परिसरात</p>.<p>बिबट्याने दोन तरुणांवर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. बिबट्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्याने हे दोन तरुण बालंबाल बचावले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.</p><p>दरम्यान, अनेकदा पिंजरा लावण्याची मागणी करूनही राहुरीच्या वनखात्याने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.</p><p>दोन दिवसांपूर्वी बिबट्याने या भागातील अनेक वाड्या वस्त्यांवर धुमाकूळ घातला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्यावेळी नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. वन विभागाने त्वरित येथे पिंजरा लावावा, अशी मागणी बुळे पठारच्या नागरिकांनी केली आहे.</p><p>बुळेपठार हा राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणारा अतिशय दुर्गम व डोंगराळ भाग आहे. येथे जंगलात वास्तव्य करणार्या बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून लोकवस्तीत होत आहे. आपल्या भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत येत असताना मानवी जीवनाचा या बिबट्याला मोठा आडथळा बनत आहे. त्यातच अचानक घरासमोर दिसलेल्या बिबट्याने तरुणांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले आहेत.</p><p>बिबट्याच्या हल्ल्यात मच्छिंद्र दुधवडे (वय 35) यांच्या हाताला जखम झाली तर तावजी केदार (वय 45) यांच्या पोटाला चावा घेतल्याने जखम झाली. प्रसंगावधान राखून त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे ते बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा केला आणि बिबट्या पळून गेला. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.</p><p>दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही वनविभागाने मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. वनविभाग नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. पिंजरा लावण्यासाठी वनखात्याच्या अधिकार्यांकडून टोलवाटोलवी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.वनखात्याचे अधिकारी नागरिकांच्या बळी जाण्याची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उमटत आहे. तातडीने पिंजरा लावून परिसरातील बिबट्या जेरबंद करा, अशी मागणी शेरी चिखलठाण व बुळेपठार शेतकर्यांनी केली आहे.</p>