वळण |वार्ताहर| Valan
सध्या नगर जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर पेटले असून गव्हाणीत उसाच्या मोळ्या टाकण्यास सुरुवात झाली आहे.
एकीकडे तोडणी कामगारांचे आंदोलन सुरू असून दुसरीकडे शेतकर्यांनी ऊस पीक आणण्यासाठी किमान बारा ते सोळा महिने शेतकर्याला शेतामध्ये रात्रंदिवस ढोर मेहनत करावी लागते. त्यातच करोना महामारीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकर्याला अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, घास, ऊस ही पिके पाण्यात गेली आहेत. तर शाश्वत पीक म्हणून शेतकर्यांनी उसाच्या लागवडी केल्या. मात्र, अतिवृष्टीमुळे उसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे उसाचे वजनही घटणार आहे.
पावसाने साचलेल्या पाण्यातून ऊस शेतातून बाहेर काढण्यासाठी रस्ते देखील नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून कोठेही रस्त्यावर एक खडीचा दगड देखील पडला नाही. त्यामुळे शेतकरी ऊस शेतातून बाहेर काढण्यासाठी हतबल होणार आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानदार भावाबाबत एक शब्दही उच्चारीत नाही.
किंवा शेतकर्याला दिवाळीसाठी काही पेमेंट देऊ असे देखील कुठलाच कारखानदार बोलत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. सर्वच भाववाढी संदर्भात आंदोलन, मोर्चे काढतात. मात्र, ऊस भावाबाबत कोणीच बोलायला तयार नाही. किमान दिवाळीसाठी शेतकर्याला पेमेंट द्यावे, अशी मागणी जिल्हा किसान शेतकर्यांचे सदस्य सुदामराव शेळके, एकनाथ तात्या खुळे, ऋषिकेश आढाव, प्रकाश खुळे, रोहिदास आढाव, आदी शेतकर्यांनी केली आहे.