राहुरीत आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी केली उचलबांगडी

राहुरीत आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी केली उचलबांगडी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर काल सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलीस प्रशासनाने दंडूकेशाहीचा वापर करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. दिवसभर आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती.

शेतीपंपाची वीजबील वसुली ताबडतोब बंद करून शेतकर्‍यांचे वीजबील माफ करावे. अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. आंदोलन सुरू होऊन पंधरा मिनिटे झाल्यानंत्तर पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळी दाखल होताच पोलीस फौजफाट्याने धाक दडपशाहीने कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. तर काही कार्यकर्त्यांची उचलबांगडी करून ताब्यात घेतले. यावेळी पोलीस प्रशासन व कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलीस वाहनाची खिडकीची काच फोडण्यात आली. पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, मधुकर शिंदे तसेच इतर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा उपस्थित होता.

त्यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाने हे आंदोलन दडपशाहीने धुळीस मिळवले. प्रहार संघटना, आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, आरपीआयचे जिल्हानेते बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास साळवे, लहानू तमनर, नामदेव पवार आदींसह आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू होती. शेतकर्‍यांसाठी तुरूंगातही जाण्याची तयारी असून त्यांच्या न्यायहक्काची मागणी करताना पोलिसांनी दडपशाही केली, यापुढेही शेतकर्‍यांसाठी संघर्ष करणार असल्याची माहिती बाळासाहेब जाधव व विलास साळवे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com