राहुरीत धनगर समाजबांधवांनी रक्ताने लिहिले निवेदन
राहुरी |प्रतिनिधी|Rahuri
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून राहुरी तहसील कार्यालयात धनगर समाजबांधवांनी डॉ. शशिकांत तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर ऐक्य अभियानामार्फत स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव तमनर यांच्या रक्ताने हे निवेदन लिहिण्यात आले असून यात आरक्षणाची अंमलबजावणी व समाजाच्या विकासाचविषयक मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले, धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करावी, आणि 1000 कोटीची तरतूद तात्काळ करावी, मेंढपाळांवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी बिरोबा महाराज मंदिर, राहुरी ट्रस्टचे अध्यक्ष काशिनाथ खेडेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव तमनर, दत्ताभाऊ खेडेकर, नरेंद्र शेटे, सरपंच श्रीकांत बाचकर, राजूभाऊ भांड, दत्ता बाचकर, पोपट शेंडगे, माने, अनिल माने, राजूभाऊ वाघ, अक्षय पाटोळे, राहुल ससाने, दादाभाऊ तमनर, भगवान खेडेकर, कोंडीराम बाचकर आदी समाजबांधवांनी स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहिले आहे.