राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची सोमवारी छाननी करण्यात आली. या छाननीत सरपंच पदासाठीचा 1 तर सदस्य पदासाठीचे 11 उमेद्वारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत.
मागील निवडणुकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खर्च दाखल न केलेल्या 3 ते 4 उमेदवारांचे, वय कमी असणे, एकाच प्रभागासाठी दोन दोन अर्ज असणे, वैधता पोहच न जोडलेले अशा विविध अपुर्ततेच्या कारणांनी अर्ज बाद झाले असल्याचे प्राधिकृत अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदासाठी 71 उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यातील आडगाव खुर्द येथील एक अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे सरपंचपदासाठी आता 70 अर्ज वैध ठरले आहेत. सदस्यांच्या 425 अर्जांपैकी 11 अर्ज या छाननीत बाद झाले आहेत. त्यामुळे आता 414 अर्ज वैध ठरले आहेत. सदस्यांसाठी बाद ठरलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नांदुर्खी खुर्द 1 अर्ज, रांजणखोल 3 अर्ज, सावळीविहीर बु. 5 अर्ज, आडगाव खुर्द 1 अर्ज, लोहगाव 1 अर्ज असे एकूण 11 अर्ज बाद झाले आहेत.
या छाननीत नांदुर्खी बु., राजुरी, डोर्हाळे, साकुरी, खडकेवाके, नपावाडी, निघोज या सात ग्रामपंचायतींत एकही अर्ज छाननीत बाद झाला नाही. या निवडणुकीसाठी 7 डिसेंबर हा माघारीचा अंतिम दिवस असल्याने या निवडणुकीचे चित्र त्याच दिवशी स्पष्ट होईल.
बहुतांशी ग्रामपंचायतींत ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना मानणार्या कार्यकर्त्यांमध्येच दुरंगी लढतीची शक्यता आहे. बिनविरोधासाठीही काही ठिकाणी प्रयत्न होऊ शकतात. तुर्तास माघारीच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होईल.