राहाता | प्रतिनीधी
दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर अहमदनगर जिल्हा अखेर अनलॉक झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियम आणि अटींसह सर्व दुकाने आणि उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मात्र दुकाने सुरू करण्यासाठी दुकानदार आणि कामगार यांची करोना चाचणी करणे बंधनकारक असल्याने राहाता शहरात चाचणीसाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने राहाता नगरपरिषदेच्या वतीने हि मोहीम राबवली जात असून व्यावसायिकांकडून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. निगेटिव्ह अहवाल असल्यानंतरच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याने दुकानदारांची टेस्ट साठी गर्दी झाली. चितळीरोड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सकाळपासुनच छोटे मोठे व्यवसायिकांनी रांगा लावल्या. गर्दीमुळे सोशल डिस्टेंन्सचा मात्र फज्जा उडाला.
नगर पालिकेच्या फिरत्या पथकाने करोना चाचण्या करताना प्रभाग निहाय किंवा शहराच्या रचनेप्रमाणे वेळ आणि दिवस ठरवून द्यावा जेणे करून करोना चाचणी करण्यासाठी एकाचवेळी गर्दी होणार नाही अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे.