
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
सर्वांनाच आपल्या राजकीय भवितव्यासाठी भाजप हा उत्तम पर्याय वाटत असल्याने शिवसेनाच काय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा संपर्कात असल्याचा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. परंतु याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहेत. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षांत भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम पर्याय आहे.
या पक्षाला उज्ज्वल भवितव्य आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे विशेष आकर्षण यापूर्वी होते आणि आता यामध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्ट करून काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपर्कात आहेत. उद्याच्या दोन पोटनिवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
राज्यपालांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या कांगाव्याला कोणताही अर्थ नाही. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसारच राजीनामा मंजूर झाला असेल. खरंतर त्यांची ज्येष्ठता, श्रेष्ठता याचा विचार करून त्यांचा सन्मान राखण्याचे भान विरोधकांनी ठेवले पाहिजे, असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, राज्यपालांनी त्या त्या वेळी व्यासपीठावर केलेल्या वक्तव्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. हा सगळा विषय पडद्याआड झाला आहे.
महाराष्ट्राच्या या राजकीय सामाजिक घडामोडीत विशेष करून किल्ले संवर्धनाचा मुद्दा याबरोबरच अनेक ऐतिहासिक बाबी राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रासाठी केल्या आहेत.एखादा अपवाद वगळता काही त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी बाजूला करून चालणार नाहीत. राज्यपाल यांचे आता 80 वर्षांचे वय बघता त्यांचा आदर करणे अपेक्षित आहे. राजकिय पक्षात आजही अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत.
ज्यांचे वय झाले आहे त्यांच्याकडून सुध्दा कधी कधी अशी वक्तव्य होऊ शकतात. म्हणजे मग त्यांनीही राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे का? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला. राजकिय प्रक्रियेत दुर्दैवाने असे वक्तव्य होत राहातात त्यातून सुधारणा करून आणखी चांगले काम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीबद्दल विचारले असता विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नाराजीची फार दखल घेतलेली नाही, असे मला वाटते. काँग्रेसच्या समित्यांचे पुनर्गठन झाले त्यामध्ये त्यांना कुठेही घेण्यात आले नाही. कुठं जायचं यासाठी त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. पण दिल्या घरी सुखी राहा असेच मी त्यांना सांगेल. आमच्या पक्षश्रेष्ठींना जर वाटले की ते पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तर त्यांचे स्वागतच असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
शिर्डी छत्रपती ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी प्रिमियर लिग चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेला शुभेच्छा देताना मंत्री यांनी जोरदार शाब्दीक फटकेबाजी केली. शिर्डीतील सर्वच खेळाडू तरबेज आहेत. कोणी बॅटींग करतो, कोणी बॉलींग टाकतो. सर्वाच्या खेळपट्ट्या ठरलेल्या आहेत. पण संघ निश्चित नसल्याने थर्ड अंपायर म्हणून माझे लक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावला.