<p><strong>शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi</strong></p><p>कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याने शिर्डी येथील पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला मग साईसंस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे हे चक्क </p>.<p>साई मंदिरातील एका फोटोत कोविड नियमांंना धाब्यावर बसवून स्वतः मास्क न लावल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून व्हीआयपी भाविकास व्दारकामाईच्या गाभार्यात थेट प्रवेश दिला हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्यकार्यकारी अधिकार्यांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार का? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला आहे.</p><p>कोव्हिडनंतर आजतागायत शिर्डीचे नगराध्यक्ष, माजी विश्वस्त, पदाधिकारी, मानकरी, स्थानिक आमदार, खासदार यांना देखिल प्रवेश दिला नाही मग या संबंधित भाविकास येथे जाण्याची परवानगी कोणी दिली?</p><p>दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशाने कोव्हिड 19 च्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करत शिर्डीचे साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. साईसमाधी मंदिर तथा मंदिर परिसरात विना मास्क प्रवेश करण्यास प्रतिबंधित केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. असे असतांना मागील काही दिवसापासून दस्तुरखुद्द संस्थानचे वरिष्ठ अधिकारीच मंदिर परिसरात शासनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे. </p><p>सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यातील एका फोटोत साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे कोणा व्हीआयपीचा सत्कार करताना दिसत असून विशेष म्हणजे यात त्या भाविकासह श्री. ठाकरे यांनी मास्क लावलेला नाही. कोविड पार्श्वभूमीवर मास्क घालणे अनिवार्य असताना त्यांनी हा नियम पायदळी तुडवला आहे. </p><p>यदाकदाचित यातील एखादा भाविक संक्रमीत असेल तर करोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. सदर भाविकाने चक्क समाधी मंदिरात मास्क वापरलेला नसल्याने समाधी मंदिरात विनामास्क असणे म्हणजे येथील सुरक्षा रक्षक, पुजारी, स्वच्छता कामगार यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे का? अलिकडे शिर्डी ग्रामस्थांना मंदिर प्रवेशासाठी नियमावली तयार होवून उच्च न्यायालयात दाखल झाली असताना दुसरीकडे अशा पद्धतीने मर्जीतील भाविकांना पायघड्या का घातल्या जातात? असा प्रश्न शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.</p><p>सामान्य भाविकांना, शिर्डीकरांना कोव्हिड नियमावलीचा प्रचंड धाक आहे, मग संस्थान अधिकार्यांना आणि त्यांच्या अतिथींना शासनाची नियमावली नाही का? मुख्यमंत्री महोदयांनी अशा अधिकार्यांना मास्क न घालण्याची विषेश परवानगी दिली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे पत्रकारांवर कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून गुन्हे दाखल केले जातात. त्याप्रमाणे आता या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करणार का हाच यक्ष प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.</p>