श्रीरामपूर |प्रतिनधी| Shrirampur
काल अंतिम वर्षाची ऑफलाईन परीक्षा होती. काल दुपारी 1 वाजता सुरू होणारी परीक्षा तब्बल साडेचार वाजता
सुरू झाल्याने काल सायंकाळी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागले. त्यामुळे विद्यापिठाच्या भोंगळ कारभारामुळे काल विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागला.
कालपासून महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरू झाल्या असून परीक्षेची वेळही दुपारी 1 वाजेची होती. त्याअगोदर सोशल डिस्टन्स, सॅनिटायझिंग असे नियम पाळले जावेत म्हणून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सकाळी 11 वाजेपासून महाविद्यालयात उपस्थित होते.
परंतु विद्यापिठाकडून या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका न आल्यामुळे सर्वजण गोंधळात सापडले. दुपारी 1 वाजता सुरू होणार्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सायंकाळी साडेचार वाजता आली. आता पेपरही रद्द करता येत नसल्यामुळे महाविद्यालयाने उशिरा का होईना काल सायंकाळी साडेचार वाजता परीक्षेस सुरुवात केली. त्यामुळे हे पेपर सुटण्यास दोन तास लागले.
त्यानंतर बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना वेळेत बस नसल्यामुळे काल रात्रीपर्यंत ताटकळत बसावे लागले. विद्यापिठाच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना मनस्ताप सहन करावा लागला. काही विद्यार्थिनी विवाहित होत्या त्यांना आपल्या लहान मुलांसह हाल सोसावे लागले. त्यात पालकांनाही विनाकारण ताटकळत बसावे लागले.