पुणतांबा पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यावरच हस्तांतर

जीवन प्राधिकरण अधिकारी आणि पाणी पुरवठा कमिटी यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय
पुणतांबा पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यावरच हस्तांतर

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जलस्वराज्य टप्पा क्र. 2 या योजने अंतर्गत येथे सुरू असलेल्या 17 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेच्या कामात त्रुटी असून संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय योजना हस्तांतरित करण्यात येणार नाही, असा निर्णय जीवन प्राधिकरण अधिकारी आणि पाणी पुरवठा कमिटी यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

गावाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणार्‍या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन पाणी योजनेचे जीवन प्राधिकरण यंत्रणेच्या माध्यमातून चार वर्षांपासून काम सुरू आहे. यामध्ये 5 किमी अंतराची मुख्य जलवाहिनी, नवीन साठवण तलाव, गाव अंतर्गत जलवाहिनी, चार जलकुंभ ही कामे पूर्ण झाली असून काही भागात पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी गावाच्या निम्यापेक्षा जास्त भागाची पाणी चाचणी अयशस्वी होत आहे. वाढीव जलवाहिनी, मीटर पध्दत, आधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामे अपुरी असून यामुळे पाणी योजनेच्या कामावरून होणार्‍या बैठकीत व इतर वेळी आरोप प्रत्यारोप केले जातात.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. बी. क्षीरसागर, उपअभियंता ए. एम. कांबळे, शाखा अभियंता बिन्नर, यांच्या उपस्थितीत योजनेच्या कामाबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच ज्योती पवार, सुहास वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, नामदेव धंनवटे, संध्याताई थोरात, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर पवार आदि उपस्थित होते.

नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा, वाढीव नळजोडणी, उर्वरित जलवाहिनी, गाव अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि गावाच्या संपूर्ण भागाला तातडीने सुरळीत पाणीपुरवठा ही कामे पूर्ण आणि कामातील त्रुटीस ठेकेदार जबाबदार असून अधिकार्‍यांनी सुचनाची दखल घेऊन लवकर योजना कार्यान्वित करुन द्यावी. त्यानंतरच योजना ताब्यात घेतली जाईल, असे डॉ. धनवटे यांनी बैठकीत स्पष्ट सांगितले.

नवीन पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आठ-दहा महिन्यांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती. मंत्री पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अधिकार्‍यांनी येथे भेट देऊन पाहणी व महिती घेतली. मात्र चौकशीचा अहवाल काय याची माहिती द्यावी, अशी मागणी श्री. वहाडणे यांनी बैठकीत करून अधिकार्‍यांना धारेवर धरले.

योजनेतील त्रुटी व अपुरी कामे लवकर पूर्ण केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत वाटेकर, नामदेव धंनवटे विनोद धंनवटे यांनी मुद्दे मांडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com