पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्या पुणतांबा-श्रीरामपूर
या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झालेली असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या श्रीरामपूर विभागाच्या अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती केली नाही. पुणतांबा ग्रामस्थांच्यावतीने येथील गणपती फाट्याजवळ धडक आंदोलन करण्याचा इशारा येथील बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष संदीप वहाडणे यांनी दिला आहे.
सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संगमेनर विभागाअंतर्गत राज्य मार्ग 36 असलेल्या या रस्त्याच्या 19 ते 48.800 किमी लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा व देखभालीचे काम 3 जुलै 2018 रोजी सुरू करण्यात आले होते.
कामाची मुदत 2 वर्षे व दोष निवारण कालावधी सुध्दा दोन वर्षांचा आहे. या रस्त्याची अंदाजपत्रकीय रक्कम अंदाजे 2 कोटी 46 लाख होती मात्र निविदा रक्कम अंदाजे 2 कोटी 46 लाख होती. चारी नंबर 20 ते खैरी निमगावपर्यंत रस्ता खूपच खराब झाला असून वाहने चालविणे जिकीरीचे झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे दोष निवारण करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी रस्त्याच्या कामाच्या कार्यादेशात नमूद केले असेल तर तातडीने ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा विभागामार्फत डागडुजी केली पाहिजे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असेल तर धडक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही श्री. वहाडणे यांनी स्पष्ट केले आहे.