पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
समन्यायी कायद्यानुसार जायकवाडी धरणात एकूण क्षमतेपैकी 65 टक्के पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना तातडीने पाणी सोडण्यात येणार आहे. गोदावरी उजव्या कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी आल्यानंतर पुणतांबा परिसरासह राहाता तालुक्यातील गावतळी, गणेश बंधारे, एकात्मिक पाणलोट क्षेत्रासह विविध योजने अंतर्गत बांधलेले बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी मनसेचे राहाता तालुकाप्रमुख गणेश जाधव यांनी केली आहे.
पुणतांबा परिसरात आतापर्यंत सरासरी सहा इंच पावसाची नोंद झालेली आहे. अद्यापही विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असली तरी परिसरातील सर्वच बंधारे अजूनही कोरडे आहेत. पावसामुळे भविष्यात ते लवकर भरतील अशी शाश्वती नाही. त्यामुळे गोदावरी उजव्या कालव्यामार्फत ओव्हरफ्लोच्या पाण्याने बंधारे भरून घेतले तर शेती व पिण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
परिसरातील अनेक बंधार्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे तसेच खोलीकरणही केलेले आहे. त्यामुळे बंधार्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविणे शक्य होणार आहे. पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी बंधार्यात पाणी सोडण्यासाठी योग्य नियोजन करून सर्व बंधारे भरून द्यावेत, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.