अहमदनगर (प्रतिनिधी) -
निधीअभावी नगरमधील भूईकोट किल्ला परिसरात विकास कामे रखडली असून तातडीने साडेचार कोटी रुपयांचा निधी
द्यावा, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे. आ. जगताप यांनी अधिवेशन सत्रात मंत्री तटकरे यांची भेट घेत नगरच्या भूईकोट किल्ल्याकडे लक्ष वेधले. आ.निरंजन डावखरे, आ. अतुल बेणके यावेळी उपस्थित होते. नगरमधील भूईकोट किल्ला हा ऐतिहासिक आहे. तेथे मुलभूत सोईसुविधा उभारण्यासाठी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागागकडून 31 मार्च 2018 रोजी 4 कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
त्यातील 50 लाख रूपये निधी वितरीत केला गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध झालेल्या 50 लाखाच्या निधीच्या निविदा प्रक्रिया राबवून ती कामे पूर्ण केली. उर्वरित निधी शासनाकडून अजूनही वितरीत झालेला नाही. त्यामुळे भूईकोट किल्ला परिसरातील विकास कामे प्रलंबित आहेत. ही कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी शासनाने राहिलेले 4 कोटी 43 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करावा अशी मागणी आ. जगताप यांनी केली.
नगर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचा प्रयत्न आहे. भूईकोट किल्ला ऐतिहासिक असून त्यासाठी तातडीने साडेचार कोटी मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून हा निधी लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.
- आ. संग्राम जगताप