श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बेलापूर येथील पुलावरुन प्रवरा नदीपात्रात उडी घेतली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत शोधकार्य सुरु होते; परंतु नदीला पाणी असल्यामुळे सापडू शकला नाही. मात्र तब्बल तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर बेलापूर खुर्द येथील राजेंद्र बारहाते या शेतकर्याचा मृतदेह मालुंजा शिवारातील नदीपात्रात सापडला आहे.
मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास बेलापूर खुर्द येथील राजेंद्र तुकाराम बारहाते या शेतकर्याने नदीच्या पुलाच्या कठड्यावर येवून उभे राहून प्रवरा नदीत उडी मारली होती. बेलापूर पोलिसानी स्थानिक ग्रामस्थ व पोहणार्यांच्या मदतीने दोन दिवस शोध घेतला पण उपयोग झाला नाही.त्यातच पाऊसही वाढला आणि नदीच्या पाण्याचा प्रवाहही वाढल्याने कदाचित मृतदेह वाहत खाली गेला असावा, अशी शक्यता होती.
मात्र काल दुपारच्या दरम्यान मालुंजाच्या काही नागरिकांना एक मृतदेह नदीपात्रात वाहत येत असताना दिसला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर तातडीने श्रीरामपूर तालुका पोलिसांना पाचारण करुन तो मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढला. त्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत बारहाते यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी असा परिवार आहे.
राजेंद्र बारहाते हे आजारी असल्यामुळे चेहर्यावर चिंताग्रस्त दिसत होते. त्यामुळे त्यांनी वैतागुन प्रवरा नदीपात्रात उडी मारली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.