पारनेर (प्रतिनिधी)
निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खून प्रकरणातील साक्षीदार असलेल्या निघोज येथील महिलेला धमकी देणारे, सुमन गंगाराम बोदगे व बबन उर्फ किसन पाटीलबा कवाद या दोघांना अहमदनगर सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
याप्रकरणी निघोज येथील सुनिता उचाळे यांनी तक्रार दाखल केली होती. उचाळे या वराळ यांच्या खून खटल्यातील साक्षीदार आहेत. हा प्रकार ९ डिसेंबर २०१९ रोजी घडला. बोदगेवाडी येथील सुमन बोदगे यांनी उचाळे यांच्या घरात घुसून तू संदीप वराळ प्रकरणात साक्ष देऊ नको, अन्यथा तुला जेलमधून सुटल्यावर ते आरोपी सोडणार नाहीत असे बबन कवाद याने सांगायला पाठवले आहे असे सांगितले होते.
उचाळे यांच्या फिर्यादीवरून सुमन बोदगे व बबन कवाद या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या गुन्ह्यातील आरोपींना पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी अटक करून गुन्ह्याचा तपास केला होता व आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. घटना घडल्याच्या ३२ दिवसानंतर हा गुन्हा दाखल केला गेला व धमकावणाऱ्या महिलेचे वय ७५ वर्षे असून त्रयस्थ व्यक्ती मार्फत धमकावने कसे होवू शकते.
घटनेआधी आरोपी बबन कवाद याने फिर्यादी महिलेच्या जवळच्या नातेवाईकांच्या विरुद्ध जुगार व मटका व्यवसाय चालवत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे याच रागातून खोटी फिर्याद दाखल केल्याचा युक्तीवाद आरोपींचे वकील अॅड. नवनाथ गर्जे यांनी केला. या खटल्याचा निकाल नगर येथील सत्र न्यायालयाच्या न्या. बी. एस. गारे यांनी दिला.