राजकारण विरहित एकत्र येवून प्रश्न सोडवायचा

उंदिरगाव येथील पारावर झालेल्या आकारी पडित वारसांच्या बैठकीत एकमुखी निर्णय
राजकारण विरहित एकत्र येवून प्रश्न सोडवायचा

माळवाडगाव|वार्ताहर|Malvadgav

शेती महामंडळाच्या हरिगाव मळा हद्दीतील 9 गावांतील आकारी पडीक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी शेती कसण्यासाठीची ई टेंडर प्रक्रिया त्वरीत रद्द करावी, आदी न्यायालयीन लढाईचा पाठपुरावा करण्यासाठी राजकारण विरहीत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कंबर कसली असून अगोदर उच्च न्यायातयात दाखल केलेल्या रिट याचिकेला पुरवणी कागदपत्रे प्रत्येक खातेदार वारसाकडून गावागावात जाऊन (वकीलत्र) अर्जाची पुर्तता करण्यात येत आहे.

आकारी पडीक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाले. मुळ आकारी पडीक वारसांना एकत्र आणण्यासाठी राजकिय कुंपणे आडवी येत असल्याने कुणीच एकत्रित येण्याचे प्रयत्न केले नाही. उच्च न्यायालयात नव्याने रिट पिटीशन दाखल झाल्यानंतरही पुन्हा हाच राजकिय प्रश्न निर्माण झाला होता.

या चळवळीस राजकीय नेते, कार्यकर्ते यांचे नेतृत्व नको, असे सर्व वारसांचे मत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 9 गावातील प्रमुख वारसदार कार्यकर्त्याना एकत्रित करून अ‍ॅड. अजित काळे यांच्याशी चर्चा घडवून आणली. नव्याने दुसरी रिट दाखल न करता या याचिकेला पुरवणी कागदपत्रे जोडून सर्व वारसांना सामावून घ्यायचे. यावर एकमत झाले.

यानंतर राजकारण विरहीत एकत्र येऊन या प्रश्नाला दिशा देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतलर 9 गावे फिरून वारसाकडून वकीलपत्र अर्ज भरुन घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. या राजकारण विरहीत कार्यकर्त्यांनी शेती महामंडळाचे स्थावर व्यवस्थापक जगताप यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की आमच्या बाप जाद्यांच्या जमिनीवर नव्याने आलेल्या धनदांडग्या करारदाराकडून रस्ते विहीरी उत्खनन, पाईपलाईन, रोहीत्र जोडणी होत आहे.

हे त्वरीत थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देण्यासाठी 9 गावांत वारसाहक्काचे कुटुंबातील सदस्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी 9 गावांतील ज्येष्ठ,व तरूण कार्यकर्ते उपस्थित होते. लढा यशस्वी होईपर्यंत कुणाचेही नांवे प्रसिध्दी माध्यमाकडे बातम्यात द्यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

राजकारण विरहीत गटतट विसरून सर्व वारसदार एका झेंड्याखाली आले तर आपल्या बापजाद्यांच्या हक्काच्या आकारली पडीक जमिनी मिळण्यास फार वेळ लागणार नाही. हे महत्व वारसदार कुटुंबांना समजल्याने अखेर सर्वांनी अ‍ॅड. अजित काळे यांचे प्रमुख उपस्थितीत आज होणार्‍या बैठकीस उपस्थित राहण्याचे नक्की केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com