<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) - </strong></p><p>अपघाती मृत्यू झालेली प्रकरणे वगळता, इतर अपघातात कोणत्याही प्रकारचे वाहने जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. जर अशा प्रकारचे </p>.<p>कृत्य कोणाबरोबर घडत असेल तर त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.</p><p>अपघातामध्ये अनेक वाहने पकडली जातात. ती पकडलेली वाहने फक्त पंचनामा तसेच आरटीओची माहिती घेण्याइतपत दोन दिवस ताब्यात ठेवावीत. मात्र, दुसरीकडे पोलिसांना कोणतीही वाहने जप्त करण्याचा अधिकार नाही. जर अशा प्रकारची कारवाई कोणी पोलिसांनी केली असेल तर नागरिकांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांकडे याची माहिती द्यावी. अप्पर पोलीस अधीक्षक अथवा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे थेट याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केला आहे.</p><p>पोलिस ठाण्यांमध्ये जुनी वाहने पडून आहेत. वास्तविक पाहता त्या वाहनांचा लिलाव अपेक्षित आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. अनेक वाहनांमध्ये संबंधितांना इन्शुरन्स मिळालेला असतो व त्यानंतर ती वाहने घेऊन जात नाही. त्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्यांमध्ये पडलेली आहेत. अशा बाबी आता लक्षात आल्यानंतर त्याची एकत्रित माहिती करून पुढील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश सुद्धा संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहे. मात्र ही प्रक्रिया मोठी असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यातील पुढील कारवाई होईल, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.</p><p>...........</p>