<p><strong>करंजी |वार्ताहर| Karanji</strong></p><p>तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते गौरवण्यात आल्यामुळे तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या</p>.<p>पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव पारेवाडीच्या सरपंचपदी ईश्वरी चिठ्ठीमुळे तिसगाव येथे चहाची टपरी चालवत असलेले महादेव तनपुरे यांच्या पत्नी आसराबाई तनपुरे यांची वर्णी लागली आहे.</p><p>पारेवाडीत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच गटाचे सातही सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. अप्रत्यक्षपणे या सर्व सदस्यांची सरपंचपदी निवड व्हावी, अशी इच्छा होती. शेवटी चिठ्ठी टाकून सरपंच पदाची निवड करण्यात आली. यामध्ये तिसगाव येथे चहाची टपरी चालवत असलेले तनपुरे यांच्या पत्नी आसराबाई यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी बाळासाहेब विश्वनाथ आठरे यांना संधी मिळाली आहे. </p><p>आदर्शगाव पारेवाडीच्या ग्रामस्थांना 15 वर्षांनंतर गावात ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यामुळे मतदान करण्याची संधी मिळाली. या निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागून 15 वर्षे सरपंच राहिलेल्या विद्यमान सरपंच यांना पराभवाचा सामना करावा लागला. नव्याने सत्तेत आलेल्या युवा वर्गातून सरपंच उपसरपंचपदी नेमकी कोणाची निवड करावी, यासाठी चिठ्ठी टाकून निवडीचा फंडा अवलंबण्यात आला. </p><p>यामध्ये आसराबाई तनपुरे यांची सरपंचपदासाठी तर बाळासाहेब आठरे यांची उपसरपंच पदासाठी वर्णी लागली. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा योगेश आठरे, मनीषा गणेश लवांडे, अशोक दिनकर आठरे, राहुल बाळासाहेब भोसले, सुनीता मिनीनाथ लवांडे यांच्यासह या गटाचे प्रमुख भाऊसाहेब आठरे, चेअरमन संदीप बर्डे, युवानेते अमोल लवांडे, शशिकांत आठरे, विशाल लवांडे, निलेश लवांडे, रंजन लवांडे, राम आठरे, विक्रम आठरे, गणेश लवांडे, नवनाथ तनपुरे,बाळासाहेब भोसले कैलास आठरे आदी उपस्थित होते.</p>