पाथर्डी जिल्हा उपरुग्णालयातील करोना रुग्णांचा बाहेर मुक्त संचार

आरोग्य प्रशासन गोंधळलेले : जनताभिमूख काम करण्यास सर्वाचीच उदासीनता
पाथर्डी जिल्हा उपरुग्णालयातील करोना रुग्णांचा बाहेर मुक्त संचार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

लॉकडाऊन करा, नाही तर कडक जनता कर्फ्यू लावा... कोरना रुग्णसंख्या ज्याप्रमाणे आटोक्यात येत नाही, त्याचप्रमाणे करोनावर उपचार घेणारे रुग्णांना सुद्धा कोणाच्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाथर्डीत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेले करोना रुग्ण मनमर्जीप्रमाणे रुग्णालया बाहेर पडून मौजमजा करत असून अशा रुग्णांनामुळेच करोेनाचा सार्वत्रिक प्रसार होतांना दिसत आहे.

पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोना वर उपचार घेणार्‍यांची संख्या दररोज बदलत आहे. यामुळे स्थानिक प्रशासन पुरते गोंधळले असून काहीही केले तरी गर्दी हटत नाही. भाजीबाजार, किराणा दुकाने बंद करून प्रशासनाने नियोजनात आणखीनच गोंधळ उडवला आहे. शहरात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु असून रमजान ईदचा सण पाहता प्रशासनाने घरपोच सेवेसाठी अत्यंत कमी वेळ दिला आहे.

सकाळच्या वेळी चहा, नाश्ता विकणारे शोधत उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण बाहेर पडत असून कुणी भेटायला आले की त्यांच्या बरोबर बाहेर निघत असून गावभर भटकंती करुन सोईस्करपणे पुन्हा येऊन बेडवर झोपत आहेत. उन्हाची वेळ टळून गेली की पुन्हा बाहेर निघत असून उपजिल्हा रुग्णालयात नेमके काय चालले आहे, याचा कोणालाही अंदाज लागत नाही. या ठिकाणी कोणत्याच सेवांचा प्रभावी लाभ गरजूंना होत नाही.

लसीकरण, विलगीकरण, लॉकडाउन, जनता कर्फ्यू, जनजागृती अशा सर्वच पातळ्यांवर निराशाजनक वातावरण असून अधिकारी फोन उचलत नाहीत. चुकून उचलला तर मोघम उत्तर देवून गायब होत आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन व संचालन गरजूंच्या हिताचे व्हावे, यासाठी वेगळ्या वाटेने काम करावे अशी लोकप्रतिनिधींचा इच्छा नाही. करोनाचे रुग्ण राजरोस बाहेर फिरत असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना नकळत प्रसाद मिळून हे सर्व टोळी सुपर स्पेडर म्हणून रुग्ण संख्या वाढवत आहेत.जेवढा आकडा शहरात दिसतो त्यात घट होईल.

साथ जेवढ्या प्रमाणात दिसते त्याप्रमाणात उपाय योजना आरोग्य यंत्रणा कडून होत नाही. वास्तविक आरोग्याच्या प्रश्नावर उपजिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेकडून पुढाकार घ्यायला हवा. प्रत्यक्षात मात्र, ज्यांना फारसा अनुभव नाही अशा महसूल विभागाकडे नियोजन जाते. प्रत्येक बैठकीत बाहेर फिरणार्‍या रुग्णाबद्दल केवळ मान डोलावनारी चर्चा होते. प्रत्यक्षात काहीही अंमलबजावणी नसल्याने शहराचे सार्वजनिक आरोग्य एरणीवर आले आहे. या प्रकाराला दोषींविरुद्ध कारवाई होण्याची लोकांची मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com