पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
राज्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेेस पक्ष सत्तेत आहे. येत्या पारनेर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाधानकारक
जागा दिल्या तर ठिक अन्यथा काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी स्वबळावर पॅनल उभा करून पूर्ण ताकदीनिशी उतरेल व निवडणूक जिंकून दाखवू असा इशारा खादीग्रामोद्योेग संघाचे चेअरमन हसन राजे यांनी दिला.
पारनेर तालुका काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठीची बैठक बुधवारी (दि. 21) पारनेर येथे खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन हसन राजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी पारनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे चेअरमन संभाजीराव रोहोकले व जिल्हा काँग्रेसचे महादेव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये श्री. शेळके यांनी पारनेर तालुका काँग्रेसचा जुना इतिहास विषद करून तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काँग्रेस पक्षाला जुने वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. रमेश गायकवाड यांनी राज्यात आघाडी सरकार असल्याने सर्व सरकारी कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांना सहभागी करून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.रणजित बाबर यांनी ना. बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले म्हणाले, ना. बाळासाहेब थोरात एक अतिशय मोठ्या मनाचे नेते आहेत. अन्यथा माझ्यासारख्या विरोधी गटाच्या माणसाला त्यांच्या घरी जाऊन काँग्रेस मध्येच राहण्यास सांगून वरून तालुक्याचे अध्यक्ष पद इतर कुणीही दिले नसते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाला मान देऊन तालुक्याचे अध्यक्षपद स्वीकारले.
त्यावेळी मी आणि ज्ञानदेव वाफारे सोडून तालुका काँग्रेसमध्ये कोणीही शिल्लक राहिले नव्हते. जुन्या जाणत्या पण सक्रिय नसणार्या लोकांना परत सक्रिय करून आणि एक एक नवीन माणूस जोडून पक्ष वाढीसाठी आपण अहोरात्र मेहनत करीत आहोत, असे श्री. रोहोकले यांनी सांगितले.
निरीक्षक आबासाहेब कोकाटे यांनी आपल्या भाषणातून तालुक्यातील पक्षाच्या वाटचालीवर अतिशय समाधान व्यक्त केले आणि भाजपासारख्या जातीयवादी पक्षाची पाळेमुळे उखडून टाकण्याचे आवाहन केले.
या बैठकीसाठी युवक काँग्रेस प्रवक्ते रणजीत पाटील, जिल्हा काँग्रेसचे सचिव माउली बाबर, सुलतानभाई शेख, सदाशिव शेळके, समन्वयक उत्तम पठारे, राहुल बाबर, राहुल मस्के, सचिन लाळगे, शशिकांत आंधळे, सुभाष ठुबे, विनायक सालके, संभाजी मोरे, संदीप सालके, गोरक्षनाथ बिलबिले, संतोष जाधव, दत्तात्रय रसाळ, धोंडीभाऊ कोकाटे, संतोष काकडे, बन्सी गागरे, रमेश गायकवाड, गुलाब खरमाऴे, अन्सार सय्यद, हरिदास सुंबे, ओंकार कोकाटे, निलेश वराळ, शामकांत ठाणगे, रामकृष्ण पवार, बाळासाहेब कळमकर, सुहास शेळके, विलास व्यवहारे, सिताराम देठे, राहुल शेलार, सचिन रोहकले, नवनाथ कापसे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन पवार यांनी केले तर आभार उत्तम पठारे यांनी मानले.