
पारनेर |प्रतिनिधी| Parner
पारनेर नगरपंचायतीच्या मंगळवारी (दि.7) झालेल्या सर्वसाधारण सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा व यासाठी शहरात जनजागृती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत पारनेर नगरपंचायतीने ऐतिहासीक निर्णय घेतला आहे.
मंगळवारी पारनेर नगरपंचायतीच्या सभागृहात उपनगराध्यक्ष सुरेखा अर्जुन भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रियंका सचिन औटी यांनी शासनाच्या 17 मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील विषया संदर्भात आजच्या सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मांडला. औटी म्हणाल्या, 21 व्या शतकातही अनेक ठिकाणी या अशा प्रथा पाळल्या जातात.
ज्यामुळे महिलांच्या जगण्यावर, वावरण्यावर मर्यादा येतात. देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे. यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात यावी. यासंदर्भात शहरामध्ये जनजागृती करण्यात यावी. असा ठराव मांडला या ठरावास पारनेर नगरपंचायतीचे सर्व विभागाचे सभापती, सर्व नगरसेवक यांनी एक मताने या ठरावास मंजुरी दिली. त्यासाठीही झालेल्या सभेमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आली.
गेले अनेक वर्षापासून विधवा प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीत पहावयास मिळत आहे. यापूर्वी अनेक त्यागी समाज सुधारकांनी या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला परंतु त्या विषयीही तीव्र विरोध पहावयास मिळाला.आपल्या समाजात पतीच्या अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे , हातातील बांगडया फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.
कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तेव्हा पारनेर शहरासह देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता राज्यातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत यासाठी परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. त्यानुसार हा ठराव मांडल्याचे औटी यांनी सांगितले.
राज्यातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत असे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. अशा विधवा प्रथांमुळे महिलांकडे समाज वेगळ्या नजरेने बघतो. त्यांना लग्न, धार्मिक तसेच सांस्कृतिक समारंभांमध्ये दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान, सन्मानापासून वंचीत ठेवले जाते. महिलांचा सन्मान राखण्याची सुरूवात करण्यासाठी पारनेर नगरपंचायतने हा निर्णय घेतला आहे
- सुरेखा अर्जुन भालेकर, उपनगराध्यक्षा, नगरपंचायत पारनेर