करंजी |प्रतिनिधी| Karanji
पाथर्डी तालुक्याच्या दौर्यावर आलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे अहमदनगरहून पाथर्डीकडे जात असताना त्यांनी देवराई येथे निवडणुकीच्या कारणावरून ठार झालेल्या अजय गोरख पालवे या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी अजय पालवेंची आई संजीवनी व आजी बबई पालवे यांचा आक्रोश पाहून पंकजाताईंनाही अश्रू अनावर झाले. माझा मुलगा आता कधीही दसरा मेळाव्याला सावरगावला येणार नाही अशा शब्दांत वडील गोरख पालवे यांनी हंबरडा फोडला. यावेळी पंकजाताई म्हणाल्या निश्चित तुमच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी देखील चर्चा करेन, एखाद्याला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतचे राजकारण कोणीही करू नये, अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी पालवे कुटुंबांला धीर देत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
मंगळवारी पाथर्डीकडे जात असताना पंकजा मुंडे ज्यावेळी देवराईत थांबल्या त्यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी सभापती संभाजी पालवे, माजी उपसभापती भरत पालवे, अॅड सतीश पालवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
देवराईत घडलेली घटना गंभीर असून या घटनेत एका गरीब कुटुंबातील तरुणाचा जीव घेण्यात आला.त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी पंकजाताई मुंडे यांच्याकडे ग्रामस्थांच्यावतीने अॅड. सतीश पालवे यांनी यावेळी केली.