नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने 1995 पासून महाराष्ट्रातील पाऊस गुजरातकडे पडतो, इथून पुढे निसर्ग बदलल्याने वातावरणात बदल होऊन कमी अधिक प्रमाणात पडणार्या पावसामुळे शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी शेतकर्यासाठी महाराष्ट्रभर फिरत शेतकर्यांना शेतीच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग करतो. भविष्यात देखील शेतकर्यांसाठी हवामान अंदाज खूप महत्वपूर्ण आहे. यापुढे निसर्गाच्या विरुद्ध शेती करू नका, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.
तालुक्यातील कुकाणा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी आमदार पांडुरंग अभंग, भैय्यासाहेब देशमुख, प्रा. नारायणराव म्हस्के, माजी सरपंच दौलतराव देशमुख, अंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख, अशोकराव मंडलिक, व्यंकटराव देशमुख, माजी सरपंच एकनाथराव कावरे, तेजश्री आसकर, सोमनाथ कचरे, वाल्मिक दुकळे यांचेसह कुकाणा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. डख म्हणाले, मी सोशल मीडिच्या माध्यमातून हवामान अंदाज सांगत असतो, 3 मिनीटांत पाच लाख लोकांना मेसेज गेल्याने शेतकर्यांचे होणारे नुकसान टळते. नगर जिल्ह्यात पूर्वेकडून पाऊस आला तर खुप पाऊस पडतो. 2023 साली खुप पाऊस पडणार असल्याचे डख यांनी सांगितले असून मान्सून 8 जूनला सक्रिय होईल, असेही ते म्हणाले. प्रशांत शित्रे यांनी आभार मानले.